डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते ? आयुक्तांनी राजीनामा तरी द्यावा, नाहीतर बदली तरी करून घ्या. – किरण काळे

अहिल्यानगर : मनपातील ७७६ रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे ३५० ते ४०० कोटींच्या महाघोटाळ्याच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा पाहता ते मनपाचे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते ? तुमच्या हाती आयुक्त म्हणून आम्ही शहर सोपवलय. मात्र तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यामध्ये व्यग्र आहात. आपल्या कार्यालयात काय चाललंय हे जर आयुक्तांना माहीत नसेल तर ठाकरे शिवसेना त्यांचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी कागदपत्रांसह सज्ज आहे, असा टोला लगावत शहर प्रमुख किरण काळे यांनी, आयुक्तांनी मनपाच्या प्रांगणात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावं. मी त्यांची शिकवणी घेऊन ते ज्या भ्रष्टाचाऱ्यांना वाचवत आहेत ते त्यांना पुराव्यानिशी दाखवून द्यायला तयार आहे, असे जाहीर आवाहन केले आहे. विकास कामां मधील भ्रष्टाचार दडवण्यासाठी त्यांची हिंदुत्वाच्या नावाने बनवाबनवी सुरू आहे. भगवा टिळा, भगवी टोपी, भगवा पंचा घालून शहराचे लोकप्रतिनिधी भगवद्गीतेत नैतिकतेने वागण्याच्या दिलेल्या उपदेशाच्या विरुद्ध वागत आहेत. हा भगव्याचा, हिंदुत्वाचा अपमान असल्याचा आरोप आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता काळे यांनी केला आहे.

किरण काळे त्यांनी उघड केलेल्या स्कॅम आणि तक्रारीनंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगर मधील स्कॅम बद्दल पत्र लिहून पुराव्यांची फाईल पाठवत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनपा आयुक्त डांगे यांनी तात्काळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत खुलासे केले होते. आ. जगताप यांनी देखील राऊत, शिवसेनेवर टीका करत चौकशी झाली असे म्हणत तसा भ्रष्टाचार झालाच नसल्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. आयुक्त डांगे, आमदार जगताप यांच्या वक्तव्यानंतर शहर शिवसेना आक्रमण झाली असून शहर प्रमुख काळे यांनी पत्रकार परिषद घेत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे, पुरावेच प्रसारमाध्यमां समोर मांडत दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवले आहे. यावेळी गौरव ढोणे, विलास उबाळे, महावीर मुथा, किशोर कोतकर, अनिस चुडीवाला, आकाश आल्हाट उपस्थित होते.

काळे म्हणाले, स्वतः आमदारांनी सांगितले आहे की निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामाशी त्यांचा थेट संबंध असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे. सर्व ठेकेदार हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. जनतेच्या तिजोरीतील निधी हे मंत्रालयातून आणतात. मनपात जनता कर भरून कोट्यावधी रुपये जमा करते. यातून गरजेपेक्षा खूप अधिक वाढीव रकमांचे इस्टिमेट राजकीय दबावातून अधिकाऱ्यांशी संगणमत करून तयार करून घेतले जातात. या सगळ्यांमध्ये १० ते ४० पर्यंतची टक्केवारी आमदार आधी जमा करून घेतात. कारण ते खोक्यांच्या सरकारचे आमदार आहेत. त्यांच्या वरदहस्था शिवाय एवढा मोठा स्कॅम होऊच शकत नाही. आमदार, मनपा अधिकारी, ठेकेदार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी काळे यांनी केली असून त्यात सगळे पोपटा सारखं बोलतील असा टोला लगावला आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे राष्ट्रीय फायर ब्रँड नेते आहेत. ईडीच्या दहशतीला न जुमानता कोणताही गुन्हा न करता देखील तुरुंगवास भोगून आलेले क्रांतिकारक आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची पात्रता आमदारांची नाही. त्यांची ती उंचीही नाही. यापूर्वी ज्या नितेश राणेंना त्यांची उंची नाही असं म्हणणारे आज त्याच राणेंच्या बाजूला जाऊन ते बसले आहेत. भगव्याच्या, हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार करत आहेत. यामुळे अन्य धर्मीय नागरिकांसह हिंदू नागरिकांना देखील नागरि सुविधां अभावी त्रास होत आहे, असा आरोप काळे यांनी केला.

डांगे यांचा समाचार घेताना काळे म्हणाले, डांगेंनी भ्रष्टाचाऱ्यांची, आमदारांची प्रवक्तेगिरी सुरू केली आहे. शहराची कामे करण्यापेक्षा कलेक्शन एजंट असणाऱ्या राजकीय हस्तक, ठेकेदार यांच्याबरोबर अँटी चेंबरमध्येच त्यांचा सगळा वेळ जातो. भ्रष्टाचारांचा तो अड्डा झाला आहे. मी ८ मे २०२३ ला पहिले पत्र याबाबत मनपा आयुक्त यांना दिले होते. त्यानंतर १५ मे, २२ मे, २३ ऑगस्ट २०२३, १४ जुलै २०२५ अशी एक नाही तर अनेक पत्र दिली आहेत. मला मनपाने २५ मे, २६ मे, २९ मे, ३१ मे २०२३ अशी एक नाहीतर अनेक वेळेला कधी अतिरिक्त मनपा आयुक्त, तर कधी उपायुक्त यांच्या समितीची नेमणूक चौकशीसाठी नेमणूक केल्याचं लेखी कळवलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर या घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा २०२३ मध्ये दिला होता. त्यावर मला आत्मदहनाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये मला ३१ मे २०२३ ला आयुक्तांच्या मान्यतेने उपयुक्त, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता निंबाळकर यांनी दीड महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवरती गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. एवढं सगळं सुरू असताना आयुक्त म्हणतात की अशी कोणती ही तक्रारच आलेली नाही. घोटाळा झालेला नाही. आयुक्त म्हणतात शासकीय तंत्रनिकेतनचे टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याबाबत मनपाकडे कोणती ही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तक्रार नाही. ३० जून २०२३ रोजी अर्धशासकीय पत्र शासकीय तंत्रनिकेतनने आयुक्तांना पाठवत पाच सदस्यांच्या समितीने चौकशी अंतिम ७७६ कामांमध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट टेस्ट रिपोर्ट जोडले असून पोलीस विभागाने सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरिता मनपाच्या ताब्यात असणाऱ्या गुन्ह्याच्या मूळ प्रति यांची मागणी केली होती. एवढेच नाही तर शासकीय निकेतनने आयुक्तांना १९ मे, २९ मे, २८ जून २०२३ ला याबाबत वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. २२ जून २०२३ ला स्मरणपत्र देखील दिल आहे. मात्र याबाबतीत आयुक्तांचा खुलासा म्हणजे त्यांना त्यांच्या आकाकडून हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी खोटी माहिती नागरिकांना देण्याचा आदेश झाल्यामुळे ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत.
आयुक्त डांगे यांना ही आरोपी करा :
कार्यालयात ते ज्या खुर्चीत बसतात त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. महाराजांच्या समोर बसून असं खोटं बोलणारे अधिकारी जर त्याकाळी असते तर महाराजांनी काय केलं असतं हे मी सांगण्याची गरज नाही. भ्रष्टाचारांना मदत करणे हा देखील भ्रष्टाचार असून या घोटाळ्यात आयुक्त डांगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, आरोपी करा अशी मागणी यावेळी किरण काळे यांनी केली.
आयुक्तांवर हक्कभंग का आणू नये ? :
मला काहीही माहित नाही. कोणतीही तक्रार समोर आलेली नाही. कोणताही घोटाळा झालेला नाही, असं वक्तव्य आणि प्रसार माध्यमांना माहिती आयुक्त डांगे यांनी दिली आहे. मुळात शिवसेनेने नेते संजय राऊत हे या देशाच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृहाचे खासदार आहेत. त्यांनी आमदार जगतापांवर गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्या पत्रकार परिषदेत केले होते. आयुक्तांना नव्हे तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिल आहे. त्या आरोपांना मात्र उत्तर हे आयुक्त पदासारख्या घटनात्मक प्रशासकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीने दिले आहे. कायदेमंडळाच्या देशातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ सदस्यांना अशा प्रकारे राजकीय उत्तर देणाऱ्या आयुक्तांवर हक्कभंग का आणला जाऊ नये ? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे. त्यातही उत्तर देताना धादांत खोटी माहिती त्यांनी मनपाच्या आयुक्त पदावरून प्रसारित केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्क भंग आणण्याबाबत आम्ही कायदेशीर माहिती घेत असल्याचे काळे म्हणाले. यामुळे डांगे यांच्या अडचणीत भविष्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आयुक्तांनी राजीनामा तरी द्यावा, नाहीतर बदली तरी करून घ्यावी :
आयुक्त डांगे हे आयुक्त नव्हे तर राजकीय कार्यकर्त्या प्रमाणे वागत आहेत. राजकारण करायची एवढीच हौस असेल तर त्यांनी कार्यक्षम, भ्रष्ट नसणाऱ्या, प्रामाणिक अधिकाऱ्यासाठी आमच्या महापालिकेच्या आयुक्त पदाची खुर्ची खाली करावी. राजीनामा द्यावा. खोके सरकार मध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत पक्ष प्रवेश करून या शहरातून मनपाची निवडणूक लढवावी. मात्र नगरकरांना कुणाच्याही रिमोट कंट्रोलवर चालत वेठीस धरू नये. अन्यथा त्यांनी बदली करून घ्यावी, असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.
मनपा प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी शहराची वाट लावली :
शहरामध्ये सर्वत्र कचऱ्यांचा खच, चौकाचौकात नागरि वस्त्यांमध्ये, बाजारपेठेमध्ये साचला आहे. ऐन पावसाळ्यात नियोजन शून्य कारभारातून बाजारपेठेच्या शहराचा बहुतांशी भाग खोदून ठेवला आहे. नळाला मैला मिश्रित पाणी येत आहे. दोन दिवस, तीन-चार, कधी कधी एक आठवड्याने पाणी येत आहे. मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. आजपर्यंत एवढी दुरावस्था या शहराची यापूर्वीच्या कोणत्याच आयुक्तांच्या काळात झाली नव्हती. विद्यमान आयुक्तांनी रिमोट कंट्रोलच्या नादात निष्क्रियतेचा विक्रम केला आहे, असे म्हणत काळे यांनी मनपाचे वाभाडे काढले असून ठाकरे शिवसेना नगरकरांच्या हक्कांसाठी आक्रमकपणे लढत राहील असे म्हटले आहे.
यांनी डांबर खाल्ले, तोंड काळे केले :
आरोप झालेल्या काळात शिवसेना, भाजपचाच महापौर होता याबाबत प्रश्न विचारला असता काळे म्हणाले, शिवसेनेने जो भ्रष्टाचार उघड केला आहे त्या काळामध्ये भाजप व मिन्धे गटाचे आत्ताचे पदाधिकारी सत्तेच्या खुर्चीवर होते. वास्तविक पाहता त्यांना येथील जनतेने निवडून दिले ते शिवसेनाप्रमुख व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैया राठोड यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्यांना निवडून दिले व ते नगरसेवक झाले हे ते विसरले. यांच्याकडे कोणता विश्वास आहे ? यांची प्रवृत्ती विटा, वाळू, गोळा करायची आहे. रस्त्यासाठी हे लागत असते तस डांबर ही लागत असत. पण यांनी डांबर सुद्धा खाल्ल आणि आता तेच डांबर तोंडालाही फासल आहे, असा आरोप काळे यांनी केला आहे.
ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दारात जाऊन रडले :
आपल्या भ्रष्टाचाराच्या फायली उघडून गुन्हे दाखल होतील. या भीतीपोटीच शहराच्या ठाकरे सेनेतील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या दारात जाऊन रडले. आम्हाला वाचवा म्हणून टाहो फोडला. शहराचे आमदार हे महायुती सरकारचे सदस्य आहेत. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आता राजकीय संरक्षण मिळाले आहे. ते भाजप, महायुतीच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होत आहेत. मात्र जनता यांना माफ करणार नाही, असा घाणाघात किरण काळे यांनी केला आहे.