न्यायालयातही खा. निलेश लंकेच जायंट किलर; पुन्हा सुजय विखेचा पराभव.

छत्रपती संभाजीनगर, दि. _ (प्रतिनिधी) : सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या कायदेशीर लढाईला आज निर्णायक पूर्णविराम मिळाला. पराभवानंतर डॉ. सुजय विखे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालय च्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयाबरोबरच न्यायालयीन लढाईतही खासदार निलेश लंके यांनी आपली बाजू भक्कमपणे सिद्ध करत विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दाखल झालेल्या या याचिकेकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने सर्व बाबींचा सखोल विचार करून याचिका ग्राह्य धरली नाही, असे स्पष्ट झाले आहे. परिणामी, निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत उपस्थित केलेले आक्षेप टिकू शकले नाहीत.
या निर्णयानंतर खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपल्या नेत्याच्या विजयाचा आनंद साजरा केला. लंके यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, “हा विजय लोकशाही प्रक्रियेचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे,” अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या निकालामुळे लंके यांची राजकीय प्रतिमा अधिक मजबूत झाली असून त्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. न्यायालयीन पातळीवरही विजय मिळाल्याने आगामी काळात त्यांच्या राजकीय वाटचालीला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे सुजय विखे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मात्र, लोकशाही व्यवस्थेत न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही राजकीय वर्तुळात अधोरेखित करण्यात येत आहे.



