जीव वाचवण्यासाठी पुरात उतरणारा जनतेचा नेता ! एनडीआरएफ सोबत खा. निलेश लंके पूरग्रस्तांच्या मदतीला.

अहिल्यानगर : प्रतिनिधी
सीना नदीच्या प्रचंड पुरात अडकलेल्या कर्जत तालुक्यातील मलठण येथील जिराफ वस्तीतील २५ ते ३० नागरिकांना वाचवण्यासाठी खा. निलेश लंके स्वतः एनडीआरएफ पथकासमवेत पुराच्या पाण्यात उतरले. जवळपास तीन ते चार तासांच्या संघर्षानंतर ही जीव वाचवणारी कारवाई यशस्वी झाली.
सीना धरणाचा विसर्ग वाढल्याने कर्जत तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील दिघी, फक्राबाद व चोंडी या गावांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. मलठणच्या जिराफ वस्तीत २२ सप्टेंबरच्या रात्रीपासून बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला होता.
जवळपास २५ ते ३० नागरिक पूरग्रस्त घरांत अडकून बसल्याची माहिती २३ सप्टेंबरला खा. लंके यांना मिळताच त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने कर्जत गाठले. प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला बोलावून बचावमोहीम सुरू केली.
खा. लंके स्वतः एनडीआरएफ जवानांसह पुराच्या प्रचंड प्रवाहात उतरले. प्रखर पावसात व वाहत्या पाण्यात तीन ते चार तास अविरत प्रयत्न करून सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. या मोहिमेदरम्यान एनडीआरएफ जवानांचा शौर्य आणि धैर्य विशेष उठून दिसले.
दिलासा देणारे क्षण : बचाव झाल्यानंतर वृद्धांच्या डोळ्यातले आनंदाश्रू, आईच्या कुशीत सुरक्षित परतलेली लेकरं आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेली दिलासादायक स्मितरेषा पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. “या कार्यात सहभागी सर्व एनडीआरएफ जवान, अधिकारी व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक सलाम,” असे मनापासून उद्गार खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केले.