शिर्डीत परिवर्तनाच्या नांदीचा पुरोहितांकडून एल्गार, भावना व्यक्त करणारे पत्र देत शिर्डीकरांना घातली एकवटण्याची साद

शिर्डी – काल सकाळी शिर्डीतील एकेकाळी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख प्रवाहातील नेते, तसेच संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बाबू पुरोहित यांनी आपल्या पुत्र विराट पुरोहित यांच्या सोबत येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपले मनोगत व्यक्त करणारे पत्र समस्त शिर्डीकरांसाठी प्रसिद्ध केले.
विराट पुरोहित हे अनेक वर्ष संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले असून त्यांनी जिल्हा कार्यवाह म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. आज त्यांनी आपल्या या पत्राद्वारे शिर्डीतील नागरिकांना सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर विचार मांडले. हे मनोगत पत्र त्यांनी शहरातील मारुती मंदिर परिसर व साई कॉम्प्लेक्स येथे व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये वाटले.
या उपक्रमाद्वारे बाबू पुरोहित यांनी थेट लोकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी त्यांचे पुत्र विराट पुरोहितही उपस्थित होते. शिर्डीतील जनतेत या पत्राबद्दल उत्सुकता व चर्चेला उधाण आले असून, या संवादातून स्थानिक पातळीवर नव्या राजकीय घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यावेळी गणेश वाघचौरे, बंडू जाधव, युवराज निम्बाळकर, गणेश मिसाळ, योगेश निकम, योगेश बडे उपस्थित होते.
कोण आहेत बाबुजी पुरोहित..= एम ए राज्यशास्त्र व डिप्लोमा इन जर्नालिझम पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. विद्यार्थिदशेत पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला.प्रमोद महाजन यांच्यासोबत एका बेंचवर बसून शिक्षण व पत्रकार म्हणून तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये नोकरी केली.पुण्यातच मैत्री झाली ती गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट यांच्याशी.त्यांच्यासोबत प्रतिकूल काळामध्ये एकत्र काम केले. ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी रुजवण्यासाठी प्रयत्न केले. नोकरी सोडून आपल्या राहत्या गावी शिर्डी या ठिकाणी पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीचे काम सुरू केले.भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ते झाले त्यानंतर ग्रामपंचायत जनसंघाच्या नावाने लढवायचा प्रारंभ केला व महाराष्ट्रातील दुसरी जनसंघाची ग्रामपंचायत यशस्वी केली.
स्वर्गीय सूर्यभान वहाडणे पाटील यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करत असताना काही काळ त्यांचे स्वीय सचिव म्हणून विनावेतन काम केले.लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणी मध्ये दीड वर्ष तुरुंगवास भोगला.शिर्डीत सामान्य माणसाच्या स्वावलंबनासाठी दुकानदारांचा संघर्ष उभा केला व पस्तीस वर्षे लढा दिला. सावळीविहीर लक्ष्मीवाडी येथे साखर कामगारांसाठी संघर्ष करून सातत्याने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शिर्डीतील लक्ष्मी नगरच्या गरीब जनतेचे पुनर्वसन व त्यांना आधार देण्याचे काम अनेक वर्ष बाबूजी पुरोहित यांनी केले.
छोट्या व्यवसायिकांना राहण्यासाठी घर व व्यवसायाचे संरक्षण अनेक वर्ष केले.बीजेपीचे पहिले खासदार धुळे शहराचे उत्तमराव पाटील हे त्यांना मानसपुत्र मानत होते.वसंतराव भागवत हे राजकीय गुरू म्हणून त्यांना लाभले.रामजन्मभूमी येथे सर्व आंदोलनात व अभियानामध्ये बाबूजी पुरोहित हे शिर्डी व परिसरातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते सहभागी झाले.2004 दंगल प्रकरण दुकानदारांच्या प्रश्नासाठी तत्कालीन प्रशासनाच्या दादागिरीला सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखवले. प्रशासनाच्या गोळीबाराचा न घाबरता शांततामय मार्गाने सामना केला दुकाने व रोजगार सुरक्षित रहावा याकरता ढाल बनले.
बाबुजी पुरोहित व श्रीरामपूरचे माजी खासदार भानुदास पाटील मुरकुटे यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यांना त्यावेळी घडून आलेल्या दंगलीचे मुख्य आरोपी केले गेले चार महिन्याचा तुरुंगवास झाला शिर्डीकरांचा हितासाठी त्यांनी त्रास भोगला.जवळपास 18 वर्षे चाललेल्या न्यायालयीन खटल्यानंतर बाबुराव पुरोहित व त्यांचे सहकारी निर्दोष झाले.शिर्डी मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी म्हणले की बाबुजी पुरोहित हे नाव सर्वोच्च स्थानी येते.उत्तम अभ्यास, प्रभावी वक्ते, संघटक, विचारांवरची निष्ठा, जनतेसाठी धावून जाण्याची वृत्ती व अचूक निर्णयांची क्षमता असे निर्भीड व्यक्तिमत्व आहे.
त्यांचे सुपुत्र विराट पुरोहित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक आहेत.त्यांना व्यायामाची आवड आहे. शरीर सौष्ठव स्पर्धेत ज्युनिअर ओपन नाशिक श्री चा पुरस्कार एकच वेळी मिळवला आहे. दोन वेळा ज्युनिअर व ओपन महाराष्ट्र स्पर्धेत नाशिक येथे प्रतिनिधित्व केले आहे.भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे एम एस सी डिफेन्स स्टडी मध्ये पूर्ण केले.आर.एस.एस चे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काम केले.अहिल्यानगर जिल्ह्यात तालुकास्तरावर जिल्हास्तर व प्रांत स्तरावरील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये संघाचे काम केले आहे.



